सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

नवी स्वप्ने नवी पहाट : किशोरी विकास केंद्र

भालचंद्र जोशी | तेलंगणा

parivartan-img

हैदराबाद मधे अमीरपेथ रेल्वे स्थानकावर एका बाकड्यावर १५-१६ वर्षांची एक अशक्त दुबळी मुलगी आपल्या आईसह बसलेली , अतिशय घाबरलेली , भेदरलेली आणि आपल्या आईच्या पदरात तोंड खुपसून हमसून हमसून रडत होती. तिच्या आईची अवस्था तर तिच्याहुनही विकट होती. असहाय ऐकाकी जणूकाही तीच सर्वस्व कुणीतरी लुटलं आहे अशी वेदना तिच्या डोळ्यांमध्ये तरळत होती. आपल्या पोटापाण्यामागे धावणाऱ्या शेकडो लोकांनी या दुर्देवी मायलेकींना पहिले पण कुणालाही त्यांच्यासाठी थांबायला, त्यांची विचारपूस करायला वेळ नव्हता. एक सहृदयी महिला मात्र अपवाद होती. ती महिला म्हणजे तेलंगाणा सेवा भारतीच्या प्रांत चिटणीस जयाप्रदा दीदी. दीदींनी त्यांची चौकशी केली तेंव्हा मिळालेल्या माहितीने त्या हादरून गेल्या. त्या १५-१६ वर्षाच्या कोवळ्या मुलीला एक रिक्षावाला जबरदस्तीने पळवून घेऊन गेला, आणि दोन दिवस तिच्या देहाचा पाशवी उपभोग घेऊन तिला हैदराबाद रेल्वे स्थानकवर सोडून तो नराधम गायब झाला. या मायलेकींना कशी मदत करावी यावर जयाप्रदा दीदी विचार करीत होत्या, आणि शेवटी त्यांची पावलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाकडे वळली. प्रश्न या एकट्या दुबळ्या मुलीचा नव्हता तर दलित उपेक्षितांच्या सेवा वस्तीतील असंख्य मुली महिलांचा होता. या अभागी मुलींना शिक्षण आणि व्यक्तिगत विकासाच्या विविध वाटा दाखवण्याची आणि त्याचबरोबरच त्यांना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचीही गरज होती. संघ स्वयंसेवकांनी अशा सेवा वस्त्यांमध्ये किशोवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासाकरता एक उपक्रम सुरु करण्याचे ठरवले. संघाचे तत्कालीन क्षेत्र सेवाप्रमुख  श्री पटोला रामारेड्डी आणि प्रांत संघ चालकांनी त्या संधर्भात अनेक बैठकी घेतल्या, आणि किशोरी विकास केंद्राची रूपरेखा निश्चित केली. ज्या सेवा वस्त्यांमध्ये बाळ संस्कार केंद्रे चालू होती तेथेच किशोरी विकास केंद्रांचे काम सुरु करण्याचे ठरविण्यात आले. इसवी सन २००४ साली नागौल आणि इब्राहीमपूर येथे अशी १० केंद्रे सुरु करण्यात आली. आज या केंद्राची संख्या २९३ झाली आहे. गेल्या १८ वर्षांमध्ये हजारो मुलींनी या केंद्रांमधील सुविधा आणि मार्गदर्शनाचा  लाभ घेतला आहे.   


भाग्यनगरांतील एका छोट्या वस्तीत सारवाणी ही कुमारिका राहत असे. वडील तिच्या लहानपणीच मरण पावले. आई काबाडकष्ट करून जेमतेम दोघींचे पोट  भारत असे. सारवाणी अत्यंत बुद्धिमान होती पण तिच्या वस्तीत  चालणाऱ्या किशोरी विकास केंद्राच्या मदतीमुळेच ती पुढे शिकु शकली.  तिथे तिने प्रथम बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले , त्यानंतर त्याच किशोरी विकास केंद्रात शिक्षिका म्हणून काम केले, आणि  तेथे मीळणाऱ्या पगाराच्या आधारावर बी. टेक . पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज टी एका मोठ्या आय. टी. कम्पनी मधे महत्वाच्या पदावर काम करीत आहे. ही नोकरी करीत असतानाच ती तेलंगाणा सेवा भारती तर्फे चालवल्या जाणाऱ्या किशोरी विकास केन्द्रांसाठी सुद्धा काम करीत आहे.

आता भाग्यनगरातील कोरवानी तांडा येथील कविता या मुलीची कहाणी पाहू या. तिचे आयुष्य तर कांदबरी सारखे अद्भुत आहे. वयाच्या बाराव्या वर्षी तिचे लग्न ठरविण्यात आले, पण सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे मत परिवर्तन करण्यात यश मिळवले, आणि कवितांचे शिक्षण सुरळीत चालू राहिले. सध्या ती भाग्यनगरातील एका ख्यातनाम विद्यालयात नृत्य आणि योग शिक्षिका म्हणून काम करीत आहे, त्याच बरोबर ती किशोरी विकास केंद्राची समन्वयक म्हणूनही काम करत आहे.


किशोरी विकास केंद्रामधील अनेक मुलींनी आपापल्या भागात कन्या विकास केंद्रे सुरु केली आहे. ही सर्व केंद्रे सेवा भारतीच्या मातृमंडळ या संघटनेबरोबर सहकार्य करून आपल्या कामाची व्याप्ती वाढवत आहे. कोरोनाच्या काळात या मुलींनी आपल्या प्राणाची पर्वा न करता सर्वत्र सीनीटाईझर, औषधे इत्यादींचे वाटप केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्षिण मध्य क्षेत्राचे सेवा प्रमुख श्री चंद्र शेखर एक्का यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे किशोरी विकास केंद्राचे काम दोन दोन तास असे समूहांमध्ये चालते. त्यात मुलींचा शाळेतील गृहपाठ करून घेतला जातो आणि त्याचबरोबर शिवणकाम, भरतकाम , मूर्ती बनवणे इत्यादी कौशल्येही शिकवली जातात. या बरोबरच अत्यंत महत्वाचे असे आत्मसरंक्षणाचे धडेही त्यांना देण्यात येतात. जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. जे घरातील नातेवाईकही सांगू शकत नाही अशा बाबतींची माहिती मुलींना देण्यात येते. निरागस स्पर्श आणि वासनामय स्पर्श यातील फरक कसा ओळखावा, समाजात वावरावे कसे, इत्यादी मुद्यांचा यात उल्लेख करता येईल. हे सर्व करत असतांनाच या मुलींच्या मनात देशभक्तीची भावनाही फुलविण्यात येते. वरवर  ट्युशन क्लास वाटावा अशा या केंद्रांमध्ये समर्थ, स्वावलंबी आणि देशभक्त तरुणींची एक संपूर्ण पिढी घडविण्यात येते.


किशोरी विकास केंद्रांसाठी लागणार पैसा वैदेही विश्वस्त संस्थेतर्फे आणि समाजाकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून उभा केला जातो, यासाठी दरवर्षी रन फॉर अ गर्ल चाइल्ड या नावानी मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. मातृमंडळमधील रमा कल्पना मीना अशा अनेक कार्यकर्त्याही किशोरी विकास केंद्रासाठी सतत कष्ट उपसत असतात. त्यांनी एकट्या कोरवानी तांडा येथेच वीस पेक्षा जास्त मुलींचे बाल विवाह टाळले आहे. आता सेवा भारतीच्या सहकार्याने या मुलींना आय टी क्षेत्राचे प्रशिक्षणही देण्यात येऊ लागले आहे.

ज्या सेवा वस्त्यांमध्ये ही  किशोरी विकास केंद्रे चालतात त्या वस्त्याचें रंगरूप पालटल्याचे दिसून येत आहे. महात्मा गांधी नगर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी जेथे जुगार आणि मादक पदार्थांच्या व्यसनाचे राज्य होते, आता तेथील तरुण हळूहळू पण निश्चितपणे व्यसनांपासून दूर होत चालले आहे. या तरुणांनी स्वतः हुन पुढाकार घेऊन किशोरी विकास केंद्रासाठी एक निवारा शेड उभी केली असून, ते आता एका मंदिराचे बांधकाम करण्याच्या प्रयत्नात आहे. या एका कन्द्राचे कार्य बघून त्या परिसरात आता  ८० नविन केंद्रे सुरु झाली आहेत.

थोडक्यात म्हणजे किशोरी विकास केंद्रांमधील तेजस्वी तडफदार तरुणींनी देशात नवी पहाट  होत असल्याचा निर्वाळा दिला आहे.

संपर्क :–  जयाप्रदा देवी

मो.नं. : – 9000755570

694 Views
अगली कहानी