सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

4 mins read

पहिले पाउल सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडल-औरंगाबाद महाराष्ट्र

माधुरी आफळे | महाराष्ट्र

parivartan-img

औरंगाबाद जवळील एका छोट्या गावात राहणाऱ्या भीमा आजीचे डोळे आज पाण्याने भरून आले होते कारण काय ! तर सरकारी कागदपत्रावर आज पहिल्यांदा तिने आपल्या पेनने सही केली होती , अंगठा नव्हता उठवला. अनेक वर्षापासून  आपल्या गावाचे नाव माहित असूनही आज ती बस वर लिहिलेले खामखेडा हे गावाचे नाव जोरजोरात वाचून जणू गाववाल्यांना सांगत होती कि, मला वाचता येते. कदाचित तिचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता की आपण लिहू शकतो वाचू शकतो 

तर औरंगाबाद येथे राहणारी आशा आपल्या जगण्याला अगदी वैतागली होती कंटाळली होती. रोजची उपासमार तिला आता सहन होत नव्हती कारण काय तर दारूचे व्यसन लागलेला तिचा नवरा. वयाच्या  22व्या वर्षी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या संपर्कात आली  आणि आज हीच आशा ताई वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी आपल्या नर्सिंग ब्यूरोत लोकांना शिकवते तर आहेच, पण त्यांना रोजगार पण मिळवून देते .सर्व सामाजिक वाईट प्रथांच्या बेड्या तोडून ,आपले खंडित झालेले शिक्षण परत सुरु करून, दहावी आणि विज्ञानात बारावी करणे आणि तेही तीन मुलांची जबाबदारी सांभाळून अजिबात सोपे नव्हते परंतु संस्थेच्या सशक्त महिला सशक्त परिवार या ध्येय वाक्याने तिला बळ मिळाले, आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळाली.


मंडळाचे अध्यक्ष व माजी कार्यवाह डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाशी विविध उपक्रमांमुळे 2000 हून जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत त्यात जवळजवळ 302 अल्प बचत गट ही आहेत. या विविध उपक्रमातील काही उपक्रम  निशुल्क आहेत, तर काहींसाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. यामध्ये निस्वार्थ भावनेने चालवले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, सेवा, शिक्षण, शेती,  स्वच्छ पाणीपुरवठा    किशोरवयीन मुलामुलिंसाठी व्यक्तिमत्व विकास केंद्र,  महिला सशक्तिकरण आणि कौशल्य विकास केंद्र, अशा अनेक प्रकल्पांचा लाभ औरंगाबाद मधील 45 सेवा वस्ती, व तसेच आजूबाजूच्या 270 गावातील किमान पंचावन्न लाखाहून जास्त लोकांना मिळाला आहे.

अनेक लोकांना जीवनात प्रोत्साहन आणि उत्साह देणाऱ्या या मंडळाची स्थापना कधी आणि कशी झाली ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे. सर्वसाधारण माणसाला स्वस्त किमतीत पण गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने मातृसंस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान च्या अंतर्गत सात डॉक्टरांनी आपल्या स्वतःच्या बचतीतून 1989 साली डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची स्थापना केली. सर्वप्रथम गावातील 3 सेवा वस्तिंमधे आरोग्य केंद्रे सुरू झाली, पण इतकेच पुरेसे नव्हते. सेवा वस्तीतील मुलांचे शिक्षण आणि महिलांचे सशक्तीकरण याची गरज लक्षात आल्यावर, 1994 साली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना झाली. या मंडळांच्या  ट्रस्टी माधुरीताई सांगतात की पैशाची कमतरता आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या वस्त्यांमधे बालविवाह करण्याची मानसिकता दिसून येत होती.


सोळा वर्षाची प्रियंका अतिशय शांत व लाजरी बुजरी होती अणि त्या परिस्थितीत कदाचित कमी वयात तिचे लग्न झाले असते, परंतु मंडळामुळे शिक्षणाबरोबरच तिने मुकुंदवाडी केंद्रात कराटेचे प्रशिक्षण घेतले. आज प्रियांका कराटे  मध्ये ब्लॅक बेल्ट आहे, अणि राज्यपातळीवर निवडली गेलेली प्रियंका आज मुकुंदवाडी केंद्रात सर्व मुलांना निशुल्क प्रशिक्षण देते.

सर्व किशोरी आता आपणहून एकत्र येऊन आपले सामर्थ्य वाढवत आहेत. मंडळाच्या अंतर्गत चालणाऱ्या अठरा विद्यार्थी विकास केंद्र, तसेच 19 किशोरी विकास केंद्रापैकी, दहा केंद्रात पंधरा हजाराहून जास्त मुले मुली प्रशिक्षण घेतात. किशोरींचे कमी वयात लग्न होणे, किंवा शिक्षण सोडायला लागणे, अशा घटनांवर लक्ष ठेवणे, आणि या गोष्टी होणार नाहीत यासाठी वेगवेगळ्या उपायांबरोंबरच शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, किशोर अवस्थेतील मुलींना पौंगडावस्थेबद्दल जागरूक करणे, अणि किशोरीच्या आरोग्य विषयांशी निगडित वेगवेगळ्या अडचणींसाठी, संस्थे मार्फत विशेष मोहिमा आखल्या जात आहे. या सगळ्या प्रकल्पांच्या सहाय्याने येथील युवती साक्षर, स्वावलंबी होत असून, महिला सक्षमीकरण करण्यासाठी चालणाऱ्या सर्व उपक्रमात भाग घेऊन स्वतःचा आत्मसन्मान आणि आपले भविष्य सुरक्षित करत आहेत.

शहरातील असो अथवा गावातील असो कौशल्य विकास केंद्र महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावत आहे. नीलम ने कधीही विचार केला नव्हता की, औरंगाबाद मधील ती एक प्रसिद्ध ब्युटीशियन बनेल, तर  मीनाक्षी ने कधीही ती पिठाच्या गिरणी ची मालकीण बनेल असा विचार केला नव्हता. केंद्रात पाचव्या वर्गात शिकायला आलेला अविनाश आज पाणी शुद्धीकरण केंद्राचा मालक आहे, पण तरीही संस्थेसाठी सेवा द्यायला तो नेहमी तत्पर असतो.

मंडळाच्या सर्व उपक्रमात सुरुवातीपासूनच महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सविता कुलकर्णी म्हणतात “देशाचे भविष्य असलेल्या  मुलांना  उच्च संस्कार आणि  सकस पोषणाचा  आधार बनणाऱ्या  मंडळाचे  प्राथमिक शिक्षण केंद्र, फक्त मुलांनाच नाही, तर त्यांच्या शिक्षकांना आणि पालकांना सुद्धा योग्य ते प्रशिक्षण देते.” विहंग शिक्षण केंद्रात दिव्यांग मुलांसाठी विविध ऑडिओलॉजी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, म्युझिक थेरपी, पेरेंट्स सपोर्ट ग्रुप, विशेष शिक्षण प्रशिक्षण इत्यादी उपक्रम चालू आहेत. जवळ जवळ 300 पेक्षा जास्त दिव्यांग मुलांसाठी नवीन शाळेचे बांधकाम होत आहे.

डॉक्टर देवाचे एक रूप असतात, हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे परंतु या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पातून आपल्याला डॉक्टरांचा चौकटी बाहेरचा विचार, आणि त्यांच्या विलक्षण कार्यपद्धतीची ओळख होते.

संपर्क सूत्र : सविता कुलकर्णी

मो. नंबर   :7721915223

1073 Views
अगली कहानी