सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

स्वयंसेवकांच्या साहसासमोर अग्निचीही शरणागती

देवीदास देशमुख | महाराष्ट्र

parivartan-img

आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले होते. आग सगळीकडे पसरली होती. गुदमरून टाकणारा धूर आणि आगीचे निखारेच सर्वत्र दिसत होते. आगीच्या या तांडवात अनेकजण जन्म-मृत्यूशी लढत होते. आगीमध्ये अडकलेले असहाय लोक किंकाळ्या फोडत होते. वेळ जात होता, तशी आगीचे रूपही विक्राळ होत होते. तिच्या तडाख्यात जे सापडेल, त्याची राख होत होती. आगीचा हा तांडव 07 डिसेंबर 2014च्या दुपारी मुंबईतील कांदिवली भागातील दामूनगर वसाहतीमध्ये झाला. गॅस सिलिंडरमुळे लागलेल्या आगीने पाहता-पाहता संपूर्ण वसाहतीला आपल्या कह्यात घेतले होते.


आग लागली, त्या वेळी अशी भीती वाटत होती, की या आगीतून कुणीही वाचणार नाही. सारे काही संपून जाईल. मात्र, असे जेव्हा वाटले, तेव्हा स्वयंसेवकांनीच मानवी साहसाची पराकाष्ठा केली आणि बचावाचे आव्हानात्मक असलेले कार्य करून दाखवले. ही घटना घडली, तेव्हा दामूनगरजवळच्या एका विद्यालयात संघ स्वयंसेवक चालवत असलेल्या जनकल्याण समितीचे कार्यकर्ता  शशिभूषण शर्मा अन्य काही स्वयंसेवकांसह उपस्थित होते. स्फोटाचा आवाज आला, तेव्हा उमेश दामले, प्रदीप शर्मा, चांद रैना, संजय खेतान आणि मनोज यांसारखे अनेक स्वयंसेवक स्फोटाच्या आवाजाच्या दिशेने धावले. दामूनगर वसाहतीतून त्यांना आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यांनी अग्निशमन दलाला सूचना दिली आणि एक क्षणही न गमावता ते सर्व जण वस्तीत शिरले.


वस्तीत सर्वत्र केवळ आग आणि आग होती. भांबावलेले लोक जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत होते. तेवढ्यात शशिभूषण यांना एक जळणारा सिलिंडर दिसला. प्राण पणाला लावून त्यांनी त्या सिलिंडरवर उडी घेतली आणि तो लोकांपासून दूर फेकला. हा सिलिंडर फेकण्यात एका क्षणाचाही उशीर झाला असता, तर त्या सिलिंडरने शशिभूषण यांच्यासह कित्येक लोकांचा जीव घेतला असता. पुढच्याच क्षणी त्यांना तिथे एक विकलांग वृद्ध महिला दिसली. धावपळीत लोकांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. शशिभूषणजींनी त्या वृद्ध मातेला उचलले आणि व्यवस्थित बाहेर घेऊन आले. समितीचे संघटनमंत्री व संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते सहदेव सोनवणे यांच्या मते, घटनेनंतर एका तासाच्या आत दहिसर ते जोगेश्वरीपर्यंत सुमारे 350 स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले. त्या गोंधळात सुमारे ७० मुले बेपत्ता झाली होती. स्वयंसेवकांनी या मुलांना शोधून त्यांच्या परिवाराकडे सोपवले.


या अग्निकांडात 2 मृत्यू झाले आणि एकूण 1250 कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आग विझली, तेव्हा पीडितांची व्यवस्था लोखंडवाला मैदानात तंबू लावून करण्यात आली. परंतु लोक बेचिराख झालेल्या घराजवळून उठायलाही तयार नव्हते. आपल्याला सरकारी नुकसानभरपाई मिळणार नाही, अशी त्यांना भीती वाटत होती. या ठिकाणी संघाने पाच दिवस व्यापक मदत कार्य राबवले. एकूण 35 लाख रुपयांची रक्कम स्वयंसेवकांच्या प्रयत्नातून जमा झाली. पीडितांना भोजन सामग्रीसहित गृहोपयोगी किट्सचे वितरण करण्यात आले. त्या वेळी नगर दंडाधिकारी पदावर असलेल्या प्रशांती माने म्हणतात, की स्वयंसेवकांचे साहस अभूतपूर्व होते! प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना भरपाई पोहोचवण्यासाठीही स्वयंसेवकांकडून मदत घेतली.





शशिभूषणजी म्हणतात, की ही वस्ती व आसपासचा परिसरच केवळ नव्हे, तर संपूर्ण मुंबईतून लोकांनी स्वयंसेवकांना आर्थिक सहकार्य केले. सर्वांत अद्भुत दान होते, ते एका गरीब वृद्धेचे, तिने आपल्या फाटक्या झोळीतील तांदूळही पीडितांसाठी दिले होते.  


खरे तर दामूनगरात लागलेली आग प्रचंड होती. मात्र, स्वयंसेवकांच्या सेवेमुळे, समर्पित वृत्तीपुढे आगीनेही नमते घेतले आणि हजारो लोकांचे प्राण या दुर्घटनेमध्ये वाचू शकले.

1188 Views
अगली कहानी