सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

सेवेला समर्पित-भारतीय नारी

देवीदास देशमुख | महाराष्ट्र

parivartan-img

अस्ताव्यस्त पसरलेल्या एका छोट्या खोलीत टीबीसारख्या गंभीर आजाराशी संघर्ष करणारा 11 वर्षांचा मुलगा सोनू, आपल्या सहा वर्षांच्या खुशबू या बहिणीसोबत कुठून तरी मागून आणलेल्या डाळीला आजसुद्धा पाण्याने फोडणी घालण्याची तयारी करत होता. तेवढ्यात तिथे रीना दीदी किशोरी विकास केंद्राच्या मुलींसोबत रेशन किट घेऊन त्याच्याकडे पोचली. तेव्हा सोनूच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही तर केवळ सुरूवात होती. आगरा शहराच्या सेवा वस्तीत राहणाऱ्या या अनाथ बहिण-भावाच्या देखभालीसोबतच शिक्षण व औषधांची व्यवस्थासुद्धा आता आगरा सेवाभारती मातृमंडळच्या भगिनी करत आहेत. 

या भगिनींनी स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबातील महिलांच्या त्या समस्यासुद्धा ओळखल्या, ज्या त्या कोणाकडे सांगू शकल्या नाहीत. पैशांची टंचाई, मैलो न् मैलांचा प्रवास, त्यात मासिक पाळीची अड़चण , या मजूर महिलांची अशी अवस्था पाहून सेवा भारतीच्या संरक्षिका डॉ. रेणुका उत्सव

यांच्या मदतीने, सेवाभारती मातृमंडळच्या बौद्धिक प्रमुख रीना सिंह यांच्या सह ममता सिंह, सुप्रिया जैन, अंजली गौतम आणि सुष्मिता सिंह यांचा हा चमू या स्थलांतरित महिलांशिवाय बस स्थानक  आणि सेवावस्तींमधे मध्ये राहणाऱ्या गरिब महिलांना मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटायला निघाल्या. आगरा व आजूबाजूच्या 127 वस्त्यांतील 20000 महिलांना नॅपकीन वाटण्यात आले, आणि कोरोना काळात निरोगी राहण्याच्या टिप्स सुद्धा देण्यात आल्या. 




असं म्हणतात, की जेव्हा स्त्री आई च्या रुपाने आपला पदर पसरते तेव्हा संपूर्ण सृष्टी त्यात विलीन होते. देशभरातील सेवा भारती मातृमंडळच्या महिलांनी कोरोना काळातील अडचणींशी झुंजणाऱ्या लोकांना रेशन वाटप करण्यापासून मास्क, पीपीई किट्स, सत्तू, लोणचे, पापड, राख्या तयार करणे व कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी हेल्पलाइन चालवण्यासारखी अनेक कामे केली. आता बोलूया त्रिपुराच्या धनपूर येथे राहणाऱ्या मीरा साहा यांच्याबद्दल, त्यांनी कोरोना काळात पतीच्या निधनानंतर स्वत:च्या नैराश्याशी संघर्ष करत "गंगासेवा संस्थान" च्या वतीने 25 बहिणींना मास्क आणि इतर आवश्यक कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले, आणि रात्रंदिवस मास्क तयार केले, त्यातून या घरांमध्ये चूल पेटली. 

तसं तर मांगीलाल (एक म्हातारा भिकारी) सोलापुरातील उद्योगवर्धिनीच्या स्वयंपाकघरातून दहा रुपयांत रोज एक थाळी जेवण घेऊन जायचे, पण जेव्हां ते लॉकडाऊनमध्ये दोन प्लेट्स घेऊन जाऊ लागले, तेव्हा चंद्रिकाताईंनी पाहिले, की ते भीक म्हणून मिळालेल्या पैशांतून इतर भिकाऱ्यांनासुद्धा खाऊ घालत आहेत, ते पाहून एका आईचे हृदय भरून आले. राष्ट्रीय सेवा भारतीच्या विश्वस्त मंडळाच्या सरचिटणीस चंद्रिका चौहान यांनी आजूबाजूच्या सर्व मंदिरांतील भिकारीवस्तीतील असहाय दिव्यांगांसह घरात बसलेल्या वृद्धांना लॉकडाऊनच्या कालावधीत मोफत भोजन देण्यास सुरवात केली. 26 मार्चपासून सलग चार महिने 250 हून अधिक लोकांना विनामूल्य भोजन देण्यात आले, आणि शेकडो स्थलांतरित कामगारांना केवळ 20 रुपयांत जेवण दिले.




संघाच्या संस्कारात वाढलेल्या या महिलांच्या सेवेबद्दल बोलताना सेवा भारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अमिता जैन भोपाळच्या 82 वर्षांच्या हरिदिनी जोशी आणि 80 वर्षांच्या प्रकाश खानुजा यांचे उदाहरण देतात. त्यांनी या वयात दिवसरात्र मास्क शिवून सेवा वस्त्यांमध्ये मोफत वाटले. भावाचा हात कोरा राहू नये, ही बहिणीची चिंता दूर करत, 65 वर्षांच्या आरती दीदी, अणि सविता दीदींनी बुऱ्हाणपुरच्या मेघाची राखी, कंकू, अक्षता व नारळासहित धन्वंतरी कॉलोनीतील त्यांच्या भावाकडे पोहोचवली. मालवा प्रांताच्या 9 शहरांमध्ये, बहिणींनी राख्या तयार करून गरजू महिलांना उत्पन्नाच स्त्रोत तर मिळवून दिलच,  तसेच हॉटस्पॉट बनलेल्या इंदूरमधील बहिणींच्या राख्या भावांपर्यंत पोचवून या अनोख्या सेवा कार्याने रक्षाबंधनाचा सण पण अविस्मरणीय बनविला. 


सेवाभारती मातृमंडळ मालवा प्रांताच्या संयोजिका सुनीताताई सांगतात, की भगिनींनी लॉकडाऊनच्या काळात बटाटा चिप्स, आंबा पापड, लसूण लोणचे, मिनी समोसा अशा काही खाद्यपदार्थांची चांगल्या पॅकेजिंगसह विक्री करून कोरोना काळातच "माँ अन्नपूर्णा बचतगट" संस्थेची स्थापना केली, आणि आणि अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींतून बाहेर काढले. जम्मू-काश्मीरच्या नगरौटाचे उदाहरण काही वेगळे नाही.  विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी बनवलेल्या जगत कॉलनीतील कुटुंबांवर जेव्हा लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट अधिकच गडद झाले तेव्हा अंजली दीदी यांच्या नेतृत्वात 100 कुटुंबांतील बहिणींनी मास्क आणि पीपीई किट शिवण्यापासून ते लोणची विकून आपल्या घराचा खर्च भागवला. कोरोना कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णांना फोन करून त्यांचा त्रास कमी करण्याचे व मनोबळ वाढविण्याचे कार्यदेखील आपल्या भगिनींनी केले.  दोन दिवसांपासून फोनमधील रिचार्ज संपल्याची चिंता करणाऱ्या 70 वर्षांच्या एकट्या वृद्ध अम्मांनी जेव्हा  एका अनोळखी महिलेचा गोड आवाज ऐकला, -तुम्ही कशा आहात??? तुम्हाला काही अडचण तर नाही ना??? त्यांना असं वाटलं, जणू स्वतः देवानंच त्यांची दखल घेतली. भोपाळ महानगर महिला सह संयोजिका आभा पांडे दीदी, आणि त्यांच्या मातृमंडळ सख्यांनी "सेवा भारती दूरभाष मित्र अभियान"च्या या कौतुकास्पद कार्यक्रमाद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, संशयित रुग्ण आणि वृद्धांसह 1400 जणांची यादी प्रशासनाकडून घेऊन, 24 तासांच्या आत, फोन रिचार्ज करून, औषधे पुरवून, कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबांना समुपदेशन करून, अनेक लोकांच्या  मनात पसरलेला अंधार उजेडाने भरून टाकला. 




देशभरात काम करणाऱ्या सेवा भारतीच्या भगिनींनी काही ठिकाणी वैद्यकीय हेल्पलाईनसुद्धा चालवल्या. तेलंगाणाच्या सहसचिव जयाप्रदा दीदी सांगतात- हैद्राबादमध्ये चालू असलेल्या सेवा भारती कोविड-हेल्पलाईन कॉल सेंटरमध्ये 50 किशोरी आणि महिलांची टीम आहे. ती डॉक्टरांच्या मदतीने लोकांच्या स्वत:च्या घरातच थंडी, सर्दी, ताप इत्यादींवर उपचार करत आहे, गर्भवती महिलांना सुरक्षित हॉस्पिटलचा रस्ता दाखवित आहे, आणि स्वयंसेवक बांधवांच्या मदतीने 500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी कोरोना किट घरी पोहोचवले आहे. 


इतिहास साक्षीला आहे, की जेव्हां जेव्हां काळाने स्त्रीच्या धैर्याची परीक्षा घेतली, तेव्हां महिलांनी आव्हानांचा सामना करून नवीन ऊर्जेला जन्म दिला आहे. देशावर घोंघावणाऱ्या कोरोना संकटात राष्ट्रीय सेवा भारती मातृमंडळच्या महिलांनी कोणाची आई, कोणाची बहिण, कोणाची मुलगी बनून अडचणीतील लोकांना आधार पुरवला आहे. कोरोना काळातील व्यथा व त्याच्याशी जोडलेल्या सेवाकथा अशाच चालत राहतील. 

पुढची कथा पुढील अंकात


676 Views
अगली कहानी